Wednesday, July 1, 2009

मुक्तसवांद :4 पुण्याचा पाहुणचार

तसा मी कोल्हापूरचा! एका लहान खेड्यात राहायचो. माझ्या आयुष्यातील सुरवातीची १६ वर्षे मी गावातच काढली. दहावीत चांगले गुण मिळवून मी पुण्यात उच्च शिक्षणासाठी आलो. गावी पुण्यात बरेच मजेशीर भिन्न अनुभव आले.

गावी पाहुण्यांचा गोतावळा बराच मोठा होता. आठवड्याला एखाद-दुसरा तरी पाहुणा घरी यायचा. पाहुणा आला म्हणजे पाहुणचार आलाच. पाहुणचाराची सुरवात मात्र पाणचट व्हायची- पाणी देऊन!

पाणी देऊन झाले, की चहा किंवा सरबत केले जायचे. पाहुणा जरी नको म्हणाला, तरी "चहा बनवला आहे,'' असे सांगून त्याला गप्प करायचे. "बिचारा नको असतानाही चहा प्यायचा.'' चहा फक्त कपातूनच द्यायचा म्हणजे गरम चहा लवकर संपणार नाही आणि तो गार होईपर्यंत आपल्या गप्पा मात्र मारून घेऊ.

आई, बाबा पाहुण्यांबरोबर गप्पा मारत असताना मी गप्प बसायचो. सर्वांचीच गप्पांची मैफील चांगलीच जमायची. मधूनच पाहुणे मला प्रश् विचारायचे.

पाहुणा जर चहा पिऊन जास्त वेळ बसला, की आई जेवणाची विचारपूस करायची. जो लाजाळू पाहुणा असायचा तो भूक लागलेली असूनही नको म्हणायचा. त्यातूनच एखादा जेवायला हवे, असे म्हणाला, की आईची धांदल उडायची.

असो!
शेवटी काय, तर पाहुणचार मात्र जोरदार व्हायचा, पाहुणा खूष होऊन जायचा.
अलीकडे मी पुण्यासारख्या शहरात राहायला आलो आहे. या ठिकाणी गावापासून दूर असल्याने पाहुण्यांचा गोतावळा तसा फारच कमी; मात्र पाहुण्यांपेक्षा मित्र व ओळखीच्या लोकांची फौजच्या फौजच असते. ओळखी किंवा मित्रता आली म्हणजे जवळीकता आली, घरी येणे-जाणे आले.
पुण्यात मात्र मी काहीशी वेगळी पद्धत अनुभवली- पाहुणचाराची! इथेही गावांप्रमाणेच पाहुणा आल्यानंतर पाण्याची विचारपूस होते. इथे पाहुणा म्हणजे ओळखीचा माणूस किंवा मित्र. चहाची पद्धत मात्र थोडी वेगळीच आहे. पाणी देऊन झाल्यानंतर, "चहा देऊ का,' असा प्रश्‍न विचारला जातो. पाहुणा लाजेने नकोच म्हणतो. बिचारा चहा हवा असतानाही तसाच राहतो. मात्र, एखादा खोडकर पाहुणा विचारल्या विचारल्याच होकार देतो. मग मात्र आईची किंवा घरातल्या गृहिणीची धांदल उडते. तिला आपल्या कामाची चिंता लागलेली असते. त्यातूनच पाहुण्याने चहाची मागणी केल्यानंतर पटकन चहा बनवून दिला जातो. पाहुणा आनंदाने चहा पिऊन खूष होतो; मात्र लाजरा पाहुणा पाण्यावरच निघून जातो.
तरी देखील पुण्यासारख्या वेगवान जीवनपद्धती असलेल्या शहरात पाहुणचारासाठी एवढा वेळ काढला यास मला दाद द्यावीच लागेल. हल्ली रक्ताचे नाते ओळखत नसलेल्या समाजामध्ये मित्रत्वाचे नाते इतके अतुटनेने जपलेले मी पाहिले आणि फारच आश्‍चर्य वाटले.
मी पुण्यात आलो, पुणेकर झालो, याबद्दल मला आजही अभिमान वाटत आहे

सौजान्य:--सकाळ

No comments:

Post a Comment