Wednesday, July 1, 2009

मुक्तसंवाद 3 :प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
अशी प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातून वर्षानुवर्षे वाचायला मिळते. ही प्रतिज्ञा आहे राष्ट्रप्रेमाबद्दलची. विद्यार्थ्यांना या देशातील परंपरांचा सार्थ अभिमान वाटावा याबद्दलची.

गेली तेहतीस वर्षे मुला-मुलींमध्ये वाचनप्रियता रुजावी, वाढावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी बालसाहित्य जत्रेपासून विविध उपक्रम संपन्न करतो आहे. सतत त्याचाच ध्यास. एक दिवस अचानक

वाचन हा देखील माझा श्‍वास आहे.

ग्रंथसंग्रह माझा ध्यास आहे.

या दोन ओळी स्फुरल्या. मग शब्दांशी खेळत साहित्य परंपरेचा अभिमान मनात रुजावा, वैश्‍विक भाषाभगिनीशी स्नेह वाढावा, वाचन, लेखन, मायबोलीचा विद्यार्थ्यांनीच नव्हे तर समस्त वाचकवर्गाने जयजयकार करावा अशी नवी प्रतिज्ञा लिहिली.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेमार्फत प्रथम अडीच हजार बुकमार्क छापले. ही ग्रंथखूण डॉ. पु. स. पाळंदे यांच्या स्मृत्यर्थ प्रसिद्ध केली. प्रायोजक होते डॉ. सतीश देसाई. ग्रंथप्रकाशन समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रसंगी हे बुकमार्क भेट म्हणून देऊ लागलो. लोकांना ही कल्पना आवडली. अजित आपटे यांना यापासून प्रेरणा मिळाली. त्यांनी ग्रंथखुणेवर लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र छापावे अशी अपेक्षा व्यक्त करत केवळ ग्रंथखूणच नव्हे तर "अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र' भित्तिपत्राच्या आकाराची ही प्रतिज्ञा प्रायोजित केली.
शाळाशाळांतून त्याचा प्रसार होऊ लागला आणि मग त्याची चांगल्या अर्थाने लागणच झाली. विषय समजताच त्याचं महत्त्व ओळखून प्रायोजक भेटू लागले. स्वामी विवेकानंद, सावरकर, आंबेडकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे यापैकी ज्याला जी व्यक्ती अधिक पूजनीय वाटायची त्याचे प्रकाशचित्र छापण्याचा आग्रह झाला. त्यानुसार बुकमार्क प्रसिद्ध होऊ लागले. विद्यार्थ्यांना कोणत्या नेत्याचे चित्र अधिक ओळखीचे हे कळून येऊ लागले.

दूरदर्शनच्या विळख्यातून दूर होऊन सर्वांनी ग्रंथ वाचावेत यासाठी गतवर्षी बालवाचकांसाठी असलेल्या छात्र प्रबोधन, कुमार, चैत्रेय, इ. विविध नेहमीच्या अथवा दिवाळी अंकातून ही नवी प्रतिज्ञा प्रसद्ध केली. अनेक जण या प्रतिज्ञेच्या प्रेमात पडले. त्या संपादकांनी अथवा व्यक्तींनी वेगवेगळ्या आकारात ही प्रतज्ञा छापून भेटीदाखल देण्याचा सपाटा सुरू केला. चांगल्या विधायक कार्यास समाजाचा पाठिंबा, प्रतसाद असतो हे त्यावरून अनुभवास आले.

ही नवी प्रतिज्ञा वाचकांच्या डोळ्यांसमोर राहावी, यासाठी ती प्रकाशकांनी पुस्तकात छापावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाठ्यपुस्तकातील प्रतज्ञेप्रमाणे ही प्रतज्ञा स्वतंत्र पानावर छापणे खर्चाचे वाटल्यास पुस्तकाच्या पान २ वर (जिथं प्रकाशक, मुद्रक मजकूर असतो) तिथे छापा, असा आग्रह मी धरत आहे. त्याला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा. कोणी माझं नाव न छापता प्रसिद्ध करण्याची मागणी केली. भारतीय संस्कृतीचे अनेक ग्रंथ अपौरुषेय आहेत. मग छोट्या प्रतिज्ञेचे काय? मी त्यांची मागणी आनंदाने मान्य केली आहे. प्रचार महत्त्वाचा ही त्यामागची माझी भूमिका.
अमेरिकेच्या साहित्य संमेलनात पाठवण्यासाठी शिरीष चिंधडे यांचेकडून ती इंग्रजी भाषेत करून घेतली. ही प्रतिज्ञा आर्ट पेपरवर रंगात छापावी असे वाटले. यासाठीचे प्रायोजकत्व दाजीकाका गाडगीळ यांनी स्वीकारले. प्रसंगी अखंडित वाचित जावे हा समर्थ रामदासांचा सोन्यासारखा विचार गाडगीळ अँड कं.च्या जाहिरातीसह छापला. डॉ. विजया वाड संपादित ८-१० पुस्तकांत ही प्रतिज्ञा छापली गेली.

ग्रंथ आपुला सखा, गुरू, बंधू हे तत्त्व मला मान्य आहे. विश्‍वातील सर्व मोठी माणसे "मोठे' होण्यात ग्रंथवाचनाचा सिंहाचा वाटा असल्याबद्दलच्या अनेकांच्या कथा मी कथाकथनातून सांगतो. संसारसागर तरुन जाण्यासाठी, नम्रतेने स्वीकारावे ही माणूसपणाची शिकवण देणारी ही प्रतिज्ञा गेल्या सव्वा वर्षात किमान लाख लोकांनी अंदाज. तुम्ही देखील या प्रतिज्ञेचे निष्ठावान प्रतिष्ठित व्हावे ही अपेक्षा. जय लेखन, जय वाचन, जय मायबोली.
- दत्ता टोळ, सदाशिव पेठ
नवी प्रतिज्ञा
वाचन हादेखील आमचा श्वास आहे.
ग्रंथसंग्रह आमचा ध्यास आहे
सारे उत्तम ग्रंथ, आमचे गुरू अन्
आमचे मित्र आहेत, मातृभाषेवर
आमचे प्रेम आहे, मराठी भाषेच्या
समृद्ध अन् विविधतेने नटलेल्या
साहित्य परंपरांचा आम्हाला
सार्थ अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक अन् वाचक होण्याची
पात्रता अंगी येण्यासाठी
आम्ही सदैव आस्वादक वाचक होऊ.
मायबोलीचा, गुरुजनांचा
वडीलधारे अन् साहित्यिकांचा
आम्ही सदैव मान ठेवू.
सर्व भाषा भगिनींशी स्नेह राखण्याची
आम्ही प्रतिज्ञा करत आहोत.
वाचन, लेखन, वैश्विक भाषासमृद्दी
यातच मनुष्यमात्राचं आम्ही सौख्य मानतो.
जय लेखन जय वाचन

सौजान्य :ई-सकाळ

No comments:

Post a Comment