Wednesday, July 1, 2009

फीचर्स 1:मन करुया प्रसन्न

चांगली शैक्षणिक पार्श्‍वभूमी असूनही पत्नीने नोकरी करणे नवऱ्याला आवडत नाही व स्वतःलाही नोकरी करण्याचा तसा कंटाळा म्हणून गृहिणी असणारी, पण नेहमी चिडचिड करणारी व सदा रडवेल्या चेहऱ्याने वावरणारी स्मिता, त्या दिवशी महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेल्या उपक्रमातील एका कार्यक्रमात भेटली आणि तिचा हसरा चेहरा, आत्मविश्‍वासपूर्वक वावर तिच्यावरील चिंतेचे, ताणाचे मळभ नाहीसे झालेले आहे किंबहुना तिला स्वतःलाच "ती' आता सापडली आहे, असे सूचित करीत होते. त्याच वेळी कायमच नोकरी व घर यापलीकडे काही करायचे तर वेळ मिळत नाही, म्हणून स्वतःवरच चिडणारी अनुजासुद्धा त्या कार्यक्रमासाठी खास वेळ काढून आलेली पाहून खरंच खूप छान वाटलं.

सध्याची स्त्री, मग ती नोकरी करणारी असो किंवा न करणारी आणि ती कोणत्याही वयोगटातील असो, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी व ताणतणाव तिच्यासमोर असतात आणि त्या ताणतणावाशी लढण्याचे मार्ग आपल्या प्रत्येकापुढे वेगवेगळे असतात. त्यातले काही विधायक, सकारात्मक, तर काही नकारात्मकही असतात. खरं तर आपण ताणाशी सामना कसा करतो, याचा थेट संबंध आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी असतो. ज्याचा परिणाम अर्थातच कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक स्वास्थ्यावरही होत असतो.
मुळात ताण म्हणजे काय, तर आपली सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता व सभोवतालच्या परिस्थितीच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा यातील अंतर वाढत जाते आणि त्या वेळी असमायोजनाची परिस्थिती उद्‌भवते. साहजिकच या निर्माण होणाऱ्या असमायोजनाचा आपल्या शरीर व मनावर प्रतिकूल परिणाम होतो.

नोकरी किंवा व्यवसाय करत अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रोजचा स्वयंपाक, मुलांची तयारी, दगदगीचा प्रवास करून ऑफिस गाठावं लागतं, अन्‌ पुन्हा ऑफिसात दिवसभर काम करून घर गाठावं लागतं. रोजचा उगवलेला दिवस कामाच्या व्यापात कसा संपतो, हे कळतही नाही. अपुरी झोप, रोजच्या प्रवासाची दगदग, कामाचा रगाडा, कुटुंबातील प्रत्येकाच्या वेळेच्या मागण्या, या सगळ्याचा परिणाम आपल्याला काय दिसतो, तर चिडचिड, तब्येतीची हेळसांड, स्वतःच्या आवडीनिवडीची काटछाट.
नोकरी न करता घरची आघाडी सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत, तर त्या घरातच असतात म्हणून त्यांना बहुतेक वेळा गृहीतच धरलं जातं . त्यामुळे निराशा, चिंता, संशयीपणा, चिडचिडेपणा त्यांच्यातही असतो. शारीरिक आरोग्याबाबत आपण जेवढे जागरूक झालेले आहोत, तेवढेच मानसिक आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर! मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, हे अजूनही पचनी पडत नाही.

नातेसंबंधातील मोठ्या ताणतणावांचा सामना पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त करतात; याची दोन प्रमुख कारणे आपल्याला दिसतात. एक म्हणजे बहुतेकींना "सुपर वूमन सिंड्रोम''ने पछाडलेले दिसतं. त्यामुळे "मी घरही उत्तम सांभाळते आणि नोकरीही उत्तम रीतीने करते,' यांसारख्या अविवेकी विचारांनी पछाडलेले असल्याने वेळप्रसंगी चिडचिड होते व मनःस्वास्थ्य बिघडलेले राहते. कारण सर्व आघाड्यांवर सारख्याच प्रभावाने लढणे, सामोरे जाणे सर्व वेळ शक्‍य होत नाही.
दुसरे कारण म्हणजे बहुतेक जणींची आपल्या घरसंसारात प्रचंड गुंतवणूक असते. त्यामुळे जरी घरकामासाठी बाई असली, तरी आपण बसविलेल्या घडीनुसार घरातील स्वच्छता, स्वयंपाक इ. गोष्टी झाल्या नाहीत तर खूप चिडचिड होते. त्यातूनच वेळी-अवेळी झोपणे, सतत टी.व्ही. पाहणे, जाता-येता सतत काहीतरी तोंडात टाकणे (खाणे), मनातल्या मनात कुढत राहणे, अशा चुकीच्या मार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे मनाचा असंतुलितपणा शारीरिक स्वास्थ्यावर प्रतकूल परिणाम करतो व मासिक पाळीतील अनियमितता, वजन वाढणे, हळवेपणा वाढणे, औदासिन्य इ. सारखी लक्षणे पाठ सोडत नाहीत. आता हे जर आपल्याला टाळायचे असेल तर-

आपण स्वतःला व स्वतःच्या भावनांना ओळखून त्या योग्य रीतीने व्यक्त करण्यास शिकले पाहिजे. बऱ्याचदा आपण मनाविरुद्ध निर्णय घेतो व मनातल्या मनात सतत कुढत राहतो. अशा वेळी आपल्या कुटुंबीयांशी त्या निर्णयासंदर्भात मनमोकळेपणाने मुद्देसूद चर्चा करण्यास आपण शिकले पाहिजे.

बऱ्याचदा इतरांशी नकळत तुलना करून आपण आपल्या चिंतेचा भार वाढवीत असतो आणि नकळत दुःखद, त्रासदायक आठवणी सतत जपून ठेवत असतो (विशेषतः सासू, नणंद आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तींच्या कृती व त्यांची शेरेबाजी). पण, जर आपण आपला व आपल्या कुटुंबीयांचा चांगल्या, वाईट गोष्टींसह स्वीकार करण्याचा प्रयत्न केला, तर आपला चिंताभार आपसूक कमी होईल.

आजच्या चौकोनी व त्रिकोणी कुटुंबाची वाटचाल "स्व'केंद्री होत चाललेली आहे. त्यामुळे कुटुंबातील संवाद व ताणतणावांचा वेळेतच होणारा निचरा हा फायदा आता मिळेनासा होत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्यासाठी व सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
खरे तर आपले विश्‍व जेवढे संकुचित, तेवढे आपले प्रश्‍न आपल्याला मोठे वाटतात. याउलट आपले विश्‍व जेवढे व्यापक, तेवढे आपले प्रश्‍न कितपत महत्त्वाचे, हे आपल्याला आपसूक जाणवतं. यामुळे कुटुंब व आपण रिफ्रेश होण्यासाठी आई, पत्नी, मुलगी, सून या भूमिकांमधून बाहेर पडून स्वतःचा एक व्यक्ती म्हणून थोडा विचार केला आणि आसपासच्या सामाजिक उपक्रमांत निखळ आनंद मिळविण्यासाठी आपण सहभागी झालो, तर तणावमुक्तीवरील लेख वाचायची वेळ आपल्यावर यायची नाही, पटतयं ना!

प्रसन्नता राखण्यासाठी...
* स्वतःवर प्रेम करायला शिका.
* स्वतःसाठी थोडा वेळ काढा.
* स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या.
* मैत्रीची नाती जोपासा.
* सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा।

सौजान्य :-सकाळ

No comments:

Post a Comment